बुलडाणा: नुकत्याच झालेल्या परतीच्या पावसाने दे. राजा तालुक्यातील सर्वच पिकांचे नुकसान 100 टक्के झाले आहे. पीके पाण्यात गेली. शेतकरी संकटात सापडला असून बळीराजाला मदतीसाठी पिकांचे पंचनामे सरसकट पूर्ण करावे, अशा सूचना पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिल्या आहेत.
तालुक्यात पावसामुळे सर्वच पिकांचे 100 टक्के नुकसान झाले असताना शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश देत पालकमंत्री डॉ शिंगणे म्हणाले, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची कार्यवाही तातडीने करावी. शेतकरी आपला केंद्रबिंदू असून रात्रंदिवस त्याच्या कल्याणासाठी काम करून त्यांना दिलासा द्यावा. नुकसान भरपाई 100 टक्के देण्यासाठी पुन्हा पंचनामे करावे. पावसामुळे रस्तेदेखील खराब झाले असून ज्या रस्त्यांना मान्यता मिळाली आहे, ते रस्ते लवकरात लवकर पुर्ण करावे. रस्त्यांची कामे करताना दर्जेदार करावी. त्यामध्ये हयगय न करता जनतेचा पैसा वाया जाता कामा नये.
ते पुढे म्हणाले, यावर्षी कोरोना संसर्गामुळे निधीची करतरता आहे. त्यामुळे उपलब्ध निधीतून कामे पूर्ण करावी. कामे करताना प्राधान्यक्रम ठरवून ती पुर्ण करावी. कृषी व महसूल यंत्रणांनी सक्रीयतेने शेत नुकसानीचे पंचनामे पूर्ण करावे. बळीराजाला तातडीने आर्थिक मदत देण्याची कार्यवाही करावी. यावेळी संबंधीत विभागाचे कर्मचारी बांधव उपस्थित होते.